
अवैध प्रवासी वाहनांचा बसस्थानकाला विळखा! परिवहन महामंडळ, पोलिस विभाग करणार संयुक्त कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील विविध एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याची बाब आणखी एकदा समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने विशेष कारवाईचे आदेश जारी केले आहेत. आता अवैध वाहतुकीच्या कारवाईसाठी एसटी प्रशासनाने पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
धक्कादायक ! अवघ्या चार महिन्यांत 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, कर्जबाजारीपणा ठरलं कारण
यवतमाळ विभागातील पांढरकवडा, वणी, राळेगाव, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, कळंब आणि बाभूळगावसह अनेक बसस्थानक परिसरात खासगी वाहनांमधून प्रवासी उचलणे आणि सोडणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. प्रवासी मिळविण्यासाठी बसस्थानकांच्या अगदी जवळ खाजगी वाहनचालकांची स्पर्धा सुरू असते. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत होऊन त्याचा परिणाम राज्य परिवहन विभागाच्या महसुलावर होतो. याची दखल खुद्द परिवहन मंत्र्यांनी घेतली असून त्यासंदर्भात राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलिस उपमहानिरीक्षकांना २०० मीटर नो पार्किंग झोन अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात यवतमाळ विभागाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात प्रवासी चढ-उतार करणाऱ्या तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात यवतमाळविभागातील सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी पोलिस विभागाला पत्र पाठवून सहकार्याची मागणी केली आहे. या पत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशांसह शासन व परिवहन विभागाच्या विविध निर्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे.
महामंडळाच्या निर्देशांनुसार, कोणत्याही बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात प्रवासी चढ-उतार करणे अथवा प्रवासी वाहतूक करणे नियमबाह्य आहे. अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. यवतमाळ विभागाने गुरुवार ते १५ जून या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. यातील १४ बसस्थानक परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान पोलिस विभाग, वाहतूक शाखा तसेच एसटी प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ५ ते १५ जून या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने दिले आहेत. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांनी याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिलेले आहेत. या मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षा विभागातील अधिकारी व पर्यवेक्षक सहभागी होणार आहेत.
Yavatmal News: शेतकऱ्यांनो, तांत्रिक बाबी वापरा! कृषी विभागाने केले आवाहन; यंदा कमी पावसाच्या अंदाज
उच्च न्यायालयाचे निर्देश, शासनाचे आदेश आणि परिवहन विभागाच्या स्पष्ट नियमांनंतरही अवैध प्रवासी वाहतुकीवर अपेक्षित प्रमाणात अंकुश बसलेला नाही. संबंधित विभागांकडून वेळोवेळी मोहिमा राबविल्या जात असल्या; तरी त्या केवळ कागदोपत्री राहतात का, अशी चर्चा आहे. दरम्यान, एसटी स्थानकांच्या २०० मीटर परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे केवळ महामंडळाचे आर्थिक नुकसान होत नाही, तर वाहतूककोंडी व सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होत असतात.