'राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?' गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल (फोटो सौजन्य-X)
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : आरएसएस नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन केले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानावर थेट निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरे यांच्यावरच नाी तर सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. “उद्धव मला असं वाटतं तुम्ही एखादे व्यंगचित्रकार असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात. तुम्ही भाषेचे ज्ञानी नाहीत. तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात, अशी खोचक टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
“राज ठाकरे ज्या पद्धतीने व्यक्त झाले, मला खरोखरच राज ठाकरेंची कीव येते. राज ठाकरे मला हे सांगा, तुमचं जी मुलं आहेत. तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? स्वत:चे लेकरं कॉन्व्हेंट, स्वत:ची लेकरं आयबीडीपीमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका”, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला. “संविधानानुसार भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह असं काहीही नाही”, असंदेखील सदावर्ते म्हणाले. अशी माहिती एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“आमचा उत्तर भारतीय असेल, गुजराती बांधव असेल, भोजपुरी भाषिक असेल, बंगाली असेल, सगळ्या भाषांचं सौंदर्य आहे. भाषा हा व्यक्त होण्याचा फॉर्म्युला आहे. भाषा ही सक्तीची असावी हे मुघली विचार असू शकतो”, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
“ऋषींसारखे भैय्याजी जोशी यांचे ७० वर्षांचा गाढा अभ्यास, संघ प्रवास आणि ते संघाचे पूर्व कार्यवाहक होते. त्यांच्या एकूण चिंतनातून व्यक्त झालेली ही बाब आहे. भाषेला अभिजात म्हणण्यापेक्षा भाषा ही आपल्या इच्छेनुसार व्यक्त होण्यासाठी एक मानवी जीवनाला मिळालेलं साधन आहे. आम्ही भैय्याजी जोशींच्या विधानांचे समर्थन करतो. आम्ही त्यांच्या विधानांचे मनापासून स्वागत करतो”, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या गटाने दिली.
“मुंबईची कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भाषात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती, त्याचप्रमाणे गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही”, असं वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ घातला. तसेच राज ठाकरे यांनीदेखील टीका केली. पण वकील गुणरत्न सदावर्ते हे भय्याजी जोशींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.