राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत... (संग्रहित फोटो)
मुंबई : मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत असून, ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत विदर्भात तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असताना, या संभाव्य पावसामुळे तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल, पण काढणीला आलेल्या पिकांसाठी हा पाऊस धोका ठरू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (विजांच्या कडकडाटासह मुसळधार सदृश पाऊस) देण्यात आला आहे. हवामानशास्त्र खात्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
राज्यात कुठे ‘यलो अलर्ट’?
– मध्य महाराष्ट्र नाशिक, पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर आणि सातारा.
– मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर.
कोकण किनारपट्टी
कोरड्या राहणाऱ्या दक्षिण कोकणात (सिंधुदुर्ग व रत्नागिरी) ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी काही अंशी ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी
दुसरीकडे, वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी (दि.26) संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना झाली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
महाबळेश्वरलाही अवकाळी पावसाने झोडपलं
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या प्रचंड गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.






