
विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका
नागपूर : विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा आणि गोंदियासह अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. परिणामी, अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपासूनच अनेक ठिकाणी वातावरणात बदल जाणवत होता. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी सुरुवातीला पाऊस व गारपीठ सुरू झाली. चांदूर रेल्वे येथे वीज कोसळली. हवामान विभागातर्फे विदर्भात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे वडाळी देशमुख, सावरा, रंभापुर, वडनेर, कालवाडी, आसेगाव आधी गावांमध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा गहू, हरभरा या पिकांसह आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरोली महागाव येथे अवकाळी पावसादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील संत लखमाजी महाराज संस्थानच्या सुमारे ४०० वर्षांच्या परंपरेला लाभलेल्या गुढीपाडवा यात्रेवर यंदा जोरदार गारपिटीने अक्षरशः घाला घातला. यामुळे हजारो भाविकांचा हिरमोड झाला असून, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेश, इंदूर, गुजरात, सूरत, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अनेक भाविकांचा ‘रोडग्यांचा’ (नैवेद्य) कार्यक्रम सुरू असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने मंदिर परिसरात चिखल झाला.
ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बुधवारी गारपीटासह अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गुरुवारी गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून, मदतीची मागणी होत आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप