
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस, म्हणजेच आपली लाडकी ‘लालपरी’, ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्याची जीवनवाहिनी बनली आहे. ग्रामीण भागाला शहरांशी जोडणारा हा एक अत्यंत भक्कम दुवा आहे. सर्वसामान्य जनता, नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी एसटी हे हक्काचे, सुरक्षित आणि परवडणारे वाहतुकीचे साधन आहे. फक्त वाहतुकीचे साधनचं म्हणून नव्हे तर आपल्या सर्वांच्या मनात एक अत्यंत भावनिक स्थान एसटीने म्हणजे आपल्या लालपरीने निर्माण केले आहे.
एसटीचा उगम आणि सुरुवातीचा प्रवास
महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीची सुरुवात १९३२ च्या सुमारास खाजगी व्यावसायिकांमार्फत झाली होती. पुढे या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारी यंत्रणेची गरज भासू लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १९४८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात ‘बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’ (बीएसआरटीसी) ची स्थापना करण्यात आली आणि सार्वजनिक वाहतुकीचा एकाधिकार या कंपनीला देण्यात आला.
पहिली एसटी
या महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर (आजचे अहिल्यानगर) या मार्गावर धावली. या ऐतिहासिक प्रवासाचे चालक तुकाराम पांडुरंग पठारे आणि वाहक लक्ष्मण केवटे हे होते. सुरुवातीच्या काळातील एसटी बसची रचना अतिशय वेगळी आणि युनिक होती. तिची बॉडी लाकडाची आणि छप्पर कापडाचे होते, तसेच तिची एकूण आसनक्षमता फक्त ३० प्रवाशांचीचं होती. नंतरच्या काळात शेवरले, बेडफोर्ड, लेलँड आणि फियाट अशा विविध कंपन्यांच्या बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या.
एमएसआरटीसीची स्थापना आणि विस्तार
१९६० मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यातूनच आजचे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ (एमएसआरटीसी) अस्तित्वात आले. “गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी” हे ब्रीदवाक्य घेऊन महामंडळाने खेड्यापाड्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले. सध्या महाराष्ट्रात ३१ विभागांद्वारे एसटीचे कामकाज चालते. महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा या शेजारील राज्यांमध्येही एसटीची आंतरराज्यीय सेवा अविरतपणे सुरू आहे.
आधुनिकता आणि बदलता चेहरा
काळाच्या ओघात एसटीने स्वतःच्या सेवेत अनेक आधुनिक बदल केले आहेत. साध्या आणि निमआराम गाड्यांसोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आल्या. डिसेंबर २००२ मध्ये दादर ते पुणे मार्गावर ‘अश्वमेध’ ही पहिली वातानुकूलित बस सुरू झाली. आज महामंडळाच्या ताफ्यात शिवनेरी, अश्वमेध, शीतल आणि २०१७ पासून ‘शिवशाही’ सारख्या आरामदायी आसन आणि शयनयान- स्लीपर श्रेणीतील बसेस उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करत एसटीने तिकिट आरक्षणासाठी स्वतःचे संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपही सुरू केले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सुविधाही दिली जाते.
सामाजिक बांधिलकी
एसटी ही केवळ एक व्यावसायिक वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राची सामाजिक गरज आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाण्याकरिता आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तालुका व जिल्हा रुग्णालयात वेळेत पोहोचवण्यासाठी लालपरी आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ही लालपरीची बस सेवा राज्याच्या प्रगतीचे आणि आर्थिक तसेच सामाजिक समृद्धीचे एक खरे आणि जिवंत प्रतीक मानली जाते.