
Horrific Accident Involving a Cargo Truck on the Pune-Bangalore Asian Highway Driver Injured satara news
Satara News : उंब्रज : पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर कोर्टी ता.कराड गावच्या हद्दीत मालट्रक पुलावरून सर्व्हिस रोडवर सुमारे ३० फुट खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघात (Accident News) झाला. यामध्ये मालट्रकचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यावेळी सर्व्हिस रो़डवरून यावेळी पादचारी आणि वाहने यांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम आणि पुलाच्या दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा सुरू असल्याने कोर्टी गावच्या हद्दीत गेल्या दीड वर्षात तीन वाहने पुलावरून खाली कोसळली आहेत. तसेच येथे दुचाकीला अपघात होऊन दोन महिला ठार झाल्याची घटना याच ठिकाणी घडली आहे. असे असताना येथे ठेकेदार कंपनीकडून हलगर्जीपणाने काम सुरू आहे. येथे वारंवार झालेल्या अपघातानंतर कोर्टी ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून महामार्ग रोखला होता. यावेळी उंब्रज पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली. परंतु पोलिसांकडून संबंधित ठेकेदार कंपनी विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.
हे देखील वाचा : निवडणूक आयोगाचा मतता दीदींना दणका; तृणमूल कॉंग्रेसला दिला अंतिम इशारा
या परिसरात कोणत्याही प्रकारचे लोखंडी बॅरिकेट, सूचनाफलक आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात आल्या नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट महामार्गावरील पुलावरून सेवा रस्त्यावर तीस फूट खाली येऊन कोसळला. या अपघातात मालट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ट्रकच्या केबिनसह संपूर्ण बॉडी चक्काचूर झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.
सदर अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात झाली नव्हती. दरम्यान कोर्टी येथे ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची व ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. मात्र पहाटेच्या सुमारस येथे कुणीही नसल्याने मोठे दुर्घटना टळली. ग्रामस्थांनी या अपघातानंतर तीव्र संताप व्यक्त केला असून ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
हे देखील वाचा : खासदार गटाची आढावा बैठकीला दांडी; सातारा नगरपालिकेत नक्की चाललंय तरी काय?