
'मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो'; नितेश राणे यांचं विधान
कोल्हापूर : खातं कोणतंही असलं तरी निधी देण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. काँग्रेसकडे आता उरलंय तरी काय? असा सवाल करत राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर (उबाठा) तोफ डागली. काँग्रेस आणि शिवसेनेला (उबाठा) विचारा तुम्ही विकासासाठी निधी अमेरिकेतून आणणार आहात की, पाकिस्तानमधून? मतदारांनो, काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांना नक्की विचारा तुमच्या नेतृत्वाकडं निधी आणायची हिंमत आहे का? असा सवाल उपस्थित करत मंत्री नितेश राणे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
राधानगरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री राणे बोलत होते. “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आहेत. ग्रामविकासमंत्री तर भारतीय जनता पार्टीचा आहे. मग काँग्रेस आणि शिवसेनेला (उबाठा) मतदान देऊ का? असा प्रश्न तुम्ही उमेदवारांना विचारा. तर सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेला (उबाठा) मी औषधाला सुद्धा ठेवलं नाही. त्यांना तिकडं उमेदवार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळं तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो,” असं मंत्री नितेश राणे म्हणाले.
तसेच देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भाजपचाच असायला हवा. अन्य पक्षांना मतदान करून काही होणार आहे. शिवसेना, काँग्रेस किंवा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून काय उपयोग आहे. त्यांच्याकडे आहे तरी काय? राधानगरी परिसरात भाजपचे उमेदवार निवडून द्या. या भागातील विकासाची जबाबदारी मंत्री म्हणून माझी असेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा मतदारसंघ असलेल्या राधानगरी तालुक्यात ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती गण आहेत. कसबा तारळे, कसबा वाळवे, राधानगरी, राशिवडे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांच्यात लढती होणार आहेत.
कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे विरुद्ध भाजपच्या ऋतुजा कौलवकर आणि काँग्रेसकडून भाग्यश्री डोंगळे यांच्यात होणारी लढत तालुक्यात लक्षवेधी ठरणार आहे. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा बालेकिल्ला असलेल्या राधानगरी-भुदरगड तालुक्यात शिवसेनेची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
हेदेखील वाचा : कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”