राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार
विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून देशभरात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काही राज्यात महापूर देखील आला आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे.
हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि अन्य जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 4 ते पांच दिवस पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे.
तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.