
राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा NCERT वादावर संताप
राजधानी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान, स्वराज्य स्थापनेसाठीचे त्यांचे कार्य आणि सर्वधर्मसमभावाची भूमिका नव्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबाबत कोणतीही दिशाभूल सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शिवचरित्राचा खरा इतिहास जपावा, अभ्यासावा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दारूबंदीच्या जावळी तालुक्यात दारूची विक्री जोमात; नवीन पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज
दरम्यान, पुण्यातील दिग्विजय प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम’चे रविवारी साताऱ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. गेली २५ वर्षे इक्वेस्ट्रीयन हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक श्री. गुणेश पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनोखी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात १७ एप्रिल रोजी ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावरून झाली असून १० मे रोजी रायगड येथे समारोप होणार आहे. महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांना अश्वारोहण करत भेट देत शिवचरित्राचा प्रसार आणि तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.
रविवारी सकाळी अश्वारोहक साताऱ्यात दाखल झाले. ऐतिहासिक शाहूनगरीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जलमंदिर पॅलेस येथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या शुभहस्ते स्वागत सोहळा पार पडला. यावेळी भाजपा सातारा जिल्हा लोकसभा संयोजक सुनीलतात्या काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, नगरसेवक पंकज चव्हाण यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.