सातारा : नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांच्या नावाची निवड केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव यांनी दिली.
सातारा येथे आगामी दि. ९ आणि १० मे रोजी १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्तानं साताऱ्याच्या प्रतिसरकारला अभिवादन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर संभाजी भगत या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे स्वागताध्यक्ष आहेत.
हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम
या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नवी दिल्ली येथील प्रो डॉ सोनाझरिया मिंझ उपस्थित राहणार आहेत. त्या मूळच्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहेत. मिंझ २००५ पासून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली येथे स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टीम्स सायन्स या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांनी झारखंडमधील दुमका येथील ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या’ कुलगुरू म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांनी मे २०२० ते जून २०२३ मध्ये कुलगुरु म्हणून काम केलं. त्यानंतर पुन्हा जवाहलाल नेहरु विद्यापीठात रुजू होत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांची जून २०२५ मध्ये यूनेस्को: आदिवासी हक्क याच्या अनुषंगाने असलेल्या समितीच्यासह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत असे डॉ भारत पाटणकर यांनी सांगितले.
प्रो डॉ. सोनाझरिया मिंझ यांनी चेन्नईत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जवाहलाल नेहरु विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात एम.फिल आणि पीएच.डी. पूर्ण केली. मिंझ यांनी आयआयटी कानपूरमधून देखील पीएच.डी केली आहे. अशा या आदिवासी समाजातील उच्चशिक्षित व तरीही आदिवासी हक्कांसाठी झटणाऱ्या प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथील १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून झालेली निवड ही नक्कीच विद्रोही चळवळीला बळ देणारी ठरेल असे संयोजन समितीचे अध्यक्ष ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे व कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी सांगितले.






