
कर्जत/ संतोष पेरणे : निवडणूक सुरू असल्याने सर्वत्र अनधिकृत कामं करणाऱ्यांना पेव फुटलं आहे. त्यात सरकारी कामे देखील जोमाने सुरू असून शंभरहून अधिक कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर चक्क माती खोदून त्यात सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. स्थानिकांनी आवाज उठवल्यावर तेथे असणारे दाक्षिणात्य ठेकेदार तसेच कर्मचारी यांना तक्रार करणारे काय बोलतात हे उमजत नसल्याने रस्त्याचे कामाचा बोजाबारा वाजण्याची शक्यता आहे.
माथेरान नेरळ कळंब या रस्त्यावरील नेरळ रेल्वे फाटक ते पोही या साधारण 12 किलोमीटर भागातील काँक्रीटीकरण न झालेल्या रस्त्यात काँक्रिट केले जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हायब्रीड तत्वावर रस्ता बनविला जात असून साधारण 115 कोटींचा निधी या रस्त्याला मंजूर झाला आहे.या रस्त्यात आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती बांधल्या जात असून ही काय करण्यासाठी तेथे खोदकाम केले जात आहे. खोदकाम करताना रस्त्याच्या आजुबाजूला असलेली झाडे तोडण्यात येत असून त्यासाठी ठेकेदारांना कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. मात्र तरीदेखील रस्त्याच्या कामाचा झपाटा सुरू आहे.
त्याबाबत निवडणूक काळ लक्षात घेऊन आपली कामे पुढे रेटण्याचा प्रयत्न ठेकेदार कंपनी करीत आहे.परंतु ठेकेदार हा स्थानिक नसल्याने लोकांना तक्रारी करणे कठीण होऊन बसले आहे. ठेकेदार राज्याबाहेरील दाक्षिणात्य असल्याने त्या ठेकेदाराने आणलेले कर्मचारी यांना मराठी काय हिंदी भाषा देखील बोलता येत नाही.त्यामुळे ठेकेदाराला मनमानी करता येत असून स्थानिक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी एकदाही आलेले नाहीत असा आरोप स्थानिक करीत आहेत.त्यामुळे कामाच्या बाबतीत तक्रारी असतील तर कोणाकडे करायच्या असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे काम सुरू असून सध्या धामोते गावापासून पुढे रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून सुरक्षा भिंती बांधल्या जात आहेत.या संरक्षक भिंती बांधताना जमीन खोदली जात असून माती निघाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे खडीकरण न करता थेट तेथे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे.त्या बाबत बिरदोले,कोदीवले गावातील ग्रामस्थांनी आवाज उठविला असता तेथे असलेल्या कर्मचारी यांना मराठी किंवा हिंदी भाषा बोलता येत नसल्याने कोणत्याही तक्रारी ठेकेदाराकडे या तक्रारी पोहचत नाहीत.
त्यामुळे काम त्याच पद्धतीने पुढे सुरूच असून निवडणूक काळात येथे राजकारणी मंडळी पोहचत नसल्याने ठेकेदाराने काम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारे सुरक्षा भिंती करण्याचे काम सुरू राहिले तर मात्र रस्त्याच्या कामाचा बोजबारा उडण्याची शक्यता आहे.बांधकाम खात्याचे अधिकारी नेरळ कळंब रस्त्यावर काय चालले आहे हे पाहण्यासाठी फिरकत नसल्याने देखील मोठी समस्या निर्माण झाली असून ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम खात्याचा आशीर्वाद आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.