
अरबी समुद्रातील आर्द्रता आणि ‘लोकल विंड’चा परिणाम
● कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत तापमानाचा पारा 36 अंशांवर असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर गेल्याने प्रत्यक्षात उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. अरबी समुद्राकडून येणा-या बाष्पयुक्त वाऱ्याऱ्यांमुळे कोल्हापूर आणि साताऱ्यात ‘अस्वस्थता निर्देशांक’ वाढला आहे. सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये कोरड्या हवेमुळे तापमान 38 अंशांपर्यंत गेले असले, तरी कोल्हापुरात वा-याचा वेग मंदावल्याने (ताशी 6 कि. मी.) शरीराला येणारा धाम सुकत नाही, परिणामी जास्त उकाडा जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही स्थिती स्थानिक वातावरणीय बदलांचे निदर्शक आहे.
युवराज मोटे, भूगोल तज्ज्ञ
कोल्हापुरात आर्द्रतेमुळे उकाड्यात झाली वाढ
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, येथे कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 71 ते 78 टक्क्यांपर्यंत नोंदवले गेले आहे. कोल्हापुरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असले, तरी वाऱ्याचा वेग ताशी 6 किमी इतका संथ असल्याने हवेतील उकाडा अधिक जाणवणार आहे.
सोलापूर ‘हॉट’, तर पुणे साताऱ्यातही दाहकता
पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्येही उन्हाची तीव्रता अधिक आहे:
सोलापूर विभागात सोलापूर जिल्हा सर्वाधिक तप्त असून, येथे तापमान 38 अंशांवर गेले आहे. येथील किमान तापमानही 25 अंश राहिल्याने रात्रीचा उकाडा कायम आहे. सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत पारा 37अंशांवर स्थिरावला आहे. कोल्हापूरप्रमाणेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांत 36अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
वाऱ्याची दिशा आणि आर्द्रतेचा खेळ सुरू
सपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 14 कि.मी. इतका अधिक आहे, तर पुणे आणि सांगलीत तो 9ते 10कि. मी. आहे. दुपारच्या वेळी सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये कोरडे हवामान (आर्द्रता 13-14 टक्के) असेल, तर उर्वरित जिल्ह्यांत 32 ते 37 टक्के आर्द्रता राहील.