
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त
सांगली : शहराच्या ऐतिहासिक स्मृतींवर पुन्हा एकदा हातोडा चालला आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत विश्रामबाग येथील दांडेकर मॉलसमोरील सांगली-मिरज रेल्वेची ऐतिहासिक तिकीटखिडकी आणि तत्कालीन स्टेशनमास्तरांचे दगडी कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. दोन शहरांना जोडणाऱ्या या छोट्या रेल्वेमार्गाचा हा अखेरचा अवशेष असल्याने इतिहासप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्याच्या सांगली-मिरज रस्त्याच्या मध्यातून धावणारी ही छोटी रेल्वे एकेकाळी दोन्ही शहरांतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय होती. सन १९०७ मध्ये सांगली संस्थानचे अल्पवयीन राजे चिंतामणराव आप्पासाहेब (दुसरे) यांच्या काळात प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या पुढाकाराने ही इंटरसिटी रेल्वे सुरू झाली होती. विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी आणि नागरिकांसाठी ती केवळ वाहतुकीचे साधन नव्हती, तर भावनिक नात्याची सखी होती. सन १९७१ मध्ये हा मार्ग बंद झाला; मात्र आठवणी जिवंत राहिल्या.
हेदेखील वाचा : मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार
या रेल्वेच्या सहवासावर प्रख्यात लेखिका मालतीबाई किर्लोस्कर यांनी लिहिलेला ‘संपता सहवास तुझा’ हा लेख वाचून अवघा महाराष्ट्र हळहळला होता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक व्ही.के.गोकाक जे त्या काळी विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य होते, त्यांनाही या छोट्या रेल्वेचे विलक्षण आकर्षण होते. रेल्वे कॉलेजसमोरून जाताना ते आपल्या चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन ‘गाडी बन्तू, गाडी नोडू’ असे म्हणत खेळवत असत, अशी आठवण सांगलीकर आजही जपून आहेत.
” भावनिक वारशाचा अखेरचा पुरावा असलेली दगडी वास्तू जतन करता आली असती, शहरांचा इतिहास न जाणता केवळ अधिकाराच्या जोरावर वारसा पाडणे ही गंभीर बाब आहे, यापूर्वी सन २००० साली मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचा भव्य दरवाजा पाडण्यात आला होता, ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अन्यथा वारशाची ही साखळी कायमची तुटेल.”
– मानसिंग कुमठेकर, इतिहास संशोधक.
हेदेखील वाचा : Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री