
अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा
निलंगा : निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील साखर कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. ‘ओमकार साखर कारखाना’ लीजवर चालवत असलेल्या या कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उघड अडवणूक सुरू असून, ऊस तोडून तब्बल चार महिने उलटले तरी घामाचे हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. एकीकडे शेतीचा खर्च, कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे कारखान्याची टाळाटाळ या दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी आज अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे हे अनेक महिन्यांपासून संपर्काबाहेर असल्याने “दाद मागायची तरी कुणाकडे?” असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
“लग्नाच्या पत्रिका वाटल्या पण हाती पैसा नाही! “शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून पिकवलेला ऊस जानेवारीतच कारखान्याला दिला. नियमानुसार १४ ते १५ दिवसांत मिळणारे बिल आज चार महिन्यांनंतरही प्रलंबित आहे. या पैशांवर अनेक कुटुंबांची स्वप्ने उभी होती. मुलींची लग्ने ठरली, पत्रिका छापून गावोगावी वाटल्या गेल्या पण आता हातात दमडी नसल्याने तीच लग्ने मोडण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी तर लग्नपत्रिका अर्जासोबत जोडून कारखाना प्रशासनासमोर अक्षरशः हात जोडले, पण प्रशासनाच्या हृदयाला पाझर फुटलेला दिसत नाही. कारखान्याच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांची पायपीट दररोज कारखान्याच्या फेऱ्या मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या, पण उत्तर मात्र शून्य !” आज देतो, उद्या देतो” अशा आश्वासनांचा खेळ सुरूच आहे. साधे समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. ज्या कारखान्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर उभारी घेतली, तोच आज त्यांच्या जिवावर उठल्याचे विदारक चित्र निलंगा परिसरात पाहायला मिळत आहे.
“आम्ही काबाडकष्ट करून ऊस पिकवला, कारखान्याने तो नेला पण आता आमच्या घामाच्या पैशांसाठी आम्हालाच भिकाऱ्यासारखे उभे राहावे लागते,” अशी वेदना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अंबुलगा येथील पीडित शेतकरी दिलीप विश्वनाथ मिरगाळे आणि त्यांच्या पत्नी शिवनंदा मिरगाळे यांनी १ मे, कामगार दिनी कारखाना परिसरात विष प्राशन करण्याचा इशारा दिला . हा इशारा केवळ एका कुटुंबाचा नसून, संपूर्ण शेतकरी वर्गाच्या असहायतेचा आणि संतापाचा ज्वालामुखी आहे.