फोटो सौजन्य- प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. प्रशासन निवडणूकीची तयारी करत आहेच. त्याशिवाय प्रशासनाद्वारे निवडणूकीच्यासंबंधी जनजागृती कार्यक्रमही राबवण्यात येत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवा याकरिता जिल्ह्यामध्ये ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत लातूर मधील दयानंद विज्ञान महाविद्यालयात आज ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाला माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिध्देश्वर बल्लाळे,डॉ. संध्या वाडीकर, डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. विलास कोमटवाड, डॉ. संदीपान जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. यावेळी डॉ. संदीपान जगदाळे यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारा पोवाडा सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांचे युवकांना मतदानासाठी आवाहन
निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदान हा लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक युवा मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा. यासोबतच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. प्रत्येक मत हे मौल्यवान असून आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचे मोल लक्षात घेवून नवमतदार, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी मतदान करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.
युवक युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद
‘कॉफी विथ कलेक्टर’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महाविद्यालयातील युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेमधील प्रत्येक मतदाराचे महत्व याबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही व्यवस्था याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये युवक-युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच लोकशाही आणि निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्राचा विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम केद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. सध्या विधानसभा निवडणूकीकरिता उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. हे अर्ज उमेदवारांना 29 ऑक्टोबर पर्यंत दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. संपुर्ण राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी ही 23 नोव्हेंबरला केली जाणार आहे.