सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; महाबळेश्वर-जावळीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पांचगणी : महाबळेश्वर (Mahabaleshwar ) आणि जावळी तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत परिसराला अक्षरशः हादरवून सोडले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी किरकोळ नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. विशेषतः महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांत विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हे देखील वाचा : Fruit Rate Drops: ग्राहकांसाठी दिलासा! ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले; टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही गावांमध्ये घरांच्या पत्र्यांना फटका बसल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. काही भागांत रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. दरम्यान, या पावसामुळे डोंगराळ भागात धुकेही वाढल्याने वाहनचालकांना विशेष दक्षता घ्यावी लागत असल्याचे दिसून आले.
या अवकाळी पावसाचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू ही पिके काढणीच्या टप्प्यात असून हातातोंडाशी आलेली सुगी या अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. ऊन-पाऊस या बदलत्या निसर्गचक्रामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी सतर्क झाले आहेत.
हे देखील वाचा : Mumbai News: प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’चे पाडकाम! वरळी-शिवडी उन्नत रोड, प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार
दरम्यान, वाई परिसरातही पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस हवामान कसे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Ans: स्थानिक वातावरणातील बदलामुळे आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे मार्च अखेरीस हा अवकाळी पाऊस पडत आहे.
Ans: रब्बी हंगामातील गहू, ज्वारी आणि स्ट्रॉबेरी पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
Ans: विजांचा कडकडाट सुरू असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.






