
Farmers Loan Waiver, Maharashtra Government,
सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 2019 मधील महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, जून 2026 च्या अखेरपर्यत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवला जाईल. त्यासाठी एक डिजिटल प्रणालीदेखील विकसित करण्यात आली आहे.
कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. यामध्ये अल्पमुदतीचे, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जांचाही समावेश असेल. खास बाब म्हणजे, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभही दिला जाणार आहे. यासोबतच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ (OTS) योजना लागू करण्यात आली आहे. तसेच,अशा शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपात्र करण्यासाठी बँकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाने कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला घेरले होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील कर्जाचा बोजा दूर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, 36,585 कोटी रुपयांचे हे पॅकेज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक ठरेल.
Maharashtra Farmers Loan Waiver: 56 Lakh Farmers to Benefit from Rs 36,585 Crore Scheme by June 30