
Sharad Pawar, Eknath Shinde, Vidhan Bhavan, Monsoon Session 2026,
Maharashtra Politics: राज्याचे विधान भवन बुधवारी (८ जुलै) राजकीय घडामोडींचे केंद्र ठरले. पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. ही बैठक सुरु असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या पक्षाच्या आमदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात दाखल झाले. ही माहिती मिळताच शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांनी दालनात शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काही काळ चर्चा झाली. त्यानंतर शिंदे पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. त्यांच्या संभाषणाचा तपशील अद्याप कळलेला नाही, परंतु राजकीय वर्तुळात नव्या तर्कवितर्क सुरू झाले आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात असली तरी या बैठकीनंतर महाविकास आघाडीत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजित पाटील उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या भेटीची चर्चा अद्याप सुरू असतानाच, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे गटातील फुटीनंतर झालेल्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
अलीकडे महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’ हा चर्चेचा विषय बनला आहे. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षांतर करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडू शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे काही आमदार किंवा खासदार सत्ताधारी आघाडीत जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जर असे झाले, तर पक्षाच्या विधिमंडळ गटावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते देशातील आगामी लोकसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जास्तीत जास्त आमदार, खासदार आणि इतर नेते आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महायुतीकडून विरोधी पक्षांतील प्रभावी नेत्यांशी संपर्क वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
‘ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते,’ अशा खरमरीत शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली. त्यांच्याच दालनात बैठक घेणे योग्य नाही. आख्ख विधानभवन ओस पडलं होतं का, असा खडा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ” विधानभवन परिसरात राष्ट्रवादी भवन आहे. शिवसेना भवन आहे. ते कमी पडलं म्हणून विधीमंडळात भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवार यांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी नियम पाळलेच पाहिजेत,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.