Sanjay Raut Slams Sharad Pawar: मविआमध्ये बिघाडी? "ज्या गद्दाराने सरकार पाडले, त्याच्याच छताखाली..."; संजय राऊतांचा थेट शरद पवारांवर वार
‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली. त्यांच्याच दालनात बैठक घेणे योग्य नाही. आख्ख विधानभवन ओस पडलं होतं का, असा खडा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ” विधानभवन परिसरात राष्ट्रवादी भवन आहे. शिवसेना भवन आहे. ते कमी पडलं म्हणून विधीमंडळात भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवार यांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी नियम पाळलेच पाहिजेत,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, हे आमच्यासारख्या निष्ठावंताचं मत आहे, पण आम्ही इतकेही सहिष्णु नाही. आमचं मन एवढ मोठ नाही. पण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता कमी होते. शरद पवार यांच्या शिंदेंच्या दालनात जाण्यामुळे सगळेच दुखावले गेले असतील. आम्ही त्यांच्या अजित दादांच्या दालनात जाऊन कधीही बैठक घेतली नसती. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना भेटणे यात काहीही गैर नाही. काल विधानभवनातील बैठकीला शरद पवार आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ही बैठक होती. त्या बैठकीत काय घडलं, हे काहीही समोर आलेले नाही. या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलावलं होतं. हे मला सांगा नाही, शिवसेना या चळवळीतील महत्त्वाचा पक्ष आहे. मग आपले वकील सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित का राहत नाहीत, मराठी माणूस गेल्या इतक्या वर्षांपासून हाल भोगतोय, कित्येक वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. याची मुख्यमंत्र्यांना जाणीव आहे का, असा सवालही संजय राऊतांनी केला.
“शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे ही कृती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दुखावणारी आहे. शरद पवार हे भाजप किंवा एनडीए (NDA) सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगू शकतो. त्यांच्या विचारधारेवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. पण काल त्यांनी जे केले, त्याची महाराष्ट्राच्या राजकारणात अजिबात गरज नव्हती. यातून तुम्ही जनतेला काय संदेश देत आहात?” जर तुम्ही गद्दारांना अशा प्रकारे प्रतिष्ठा देणार असाल, तर मग आपल्या पक्षात झालेल्या बंडखोरीवर किंवा गद्दारीवर बोलण्याचा नैतिक हक्क आपल्याला उरत नाही. मग त्यांच्याविरोधात कोर्टात जाण्याची किंवा लढण्याची काय गरज आहे? “एकनाथ शिंदे हे काय यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक किंवा विलासराव देशमुख आहेत का, की ज्यांच्या दालनात जाऊन एवढ्या ज्येष्ठ नेत्याने बैठक घ्यावी?” असा जळजळीत सवाल राऊत यांनी केला.






