मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील महत्त्वाचे राजकीय गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारपेठच्या विकासकामांना सध्या चांगलीच गती मिळाली असून, विविध विकासकामांमुळे गावाचे रूपडे बदलताना दिसत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सहकार्य व मार्गदर्शनातून लोकनियुक्त सरपंच किरण दशवंत व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना चालना मिळत असून, सरपंचांच्या पुढाकारातून गावातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जात आहे.
मल्हारपेठ येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रस्ते दुरुस्ती, गटारी, पथदिवे तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गावातील अनेक भागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. पावसाळ्यात चिखल व पाण्याचा त्रास होणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ रस्त्यांपुरते मर्यादित न राहता, स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीही ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
मल्हारपेठ हे परिसरातील बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासाची गरज आहे. त्यादृष्टीने सुरू असलेल्या कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र आहे.
“गावाचा विकास हा केवळ एका कामाने होत नाही; प्रत्येक नागरिकाला आवश्यक सुविधा मिळणे आणि गावाचे सुंदर, स्वच्छ व सुरक्षित रूप तयार होणे हेच विकासाचे खरे उद्दिष्ट आहे,” अशी भूमिका लोकनियुक्त सरपंच किरण दशवंत व ग्रामपंचायत प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. पालकमंत्र्यांचे पाठबळ, ग्रामपंचायतीचे नियोजन आणि सरपंचांचा पुढाकार यामुळे मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड सुरू असून, आगामी काळात आणखी विकासकामे मार्गी लागण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
kolhapur : जळालं होतं, पण स्वप्न जळलं नाही ! केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिले






