वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त
वाई : वाई शहरात अनेक वर्षांपासून गटारे तुंबणे, सांडपाणी रस्त्यावर वाहणे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे साथीच्या रोगांचा धोका सातत्याने वाढत आहे. डेंगू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर संसर्गजन्य आजारांनी नागरिकांचे जीवन असुरक्षित झाले असताना, वाई नगरपरिषदेची निष्क्रियता आता नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.
शहरातील अनेक भागांत गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवर वाहत आहे. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत असून, साथीच्या रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे नगरपरिषदेचे अधिकारी, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
रोगराई रोखण्यासाठी आवश्यक असलेली फॉगिंग, जंतुनाशक औषधांची फवारणी, ब्लीचिंग पावडर टाकणे, गटारांची तातडीने साफसफाई, साचलेले पाणी हटवणे आणि प्रतिबंधात्मक जनजागृती अशा मूलभूत उपाययोजना अद्याप प्रभावीपणे राबविल्या गेल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डेंगूसारख्या प्राणघातक आजारामुळे अनेक कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. अनेक संसार उद्ध्वस्त झाले, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाईकर व्यक्त करत आहेत.
“प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांनी आपल्या भागातील गटारे, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपायांची जबाबदारी का पार पाडली नाही? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना कोणी दिला?” असा संतप्त सवाल आता वाईकर नागरिक विचारू लागले आहेत.
नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, हजारो नागरिक साथीच्या रोगांच्या विळख्यात सापडण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी. सर्व गटारे तातडीने साफ करावीत, फॉगिंग व औषध फवारणी नियमित करावी, पाण्याची डबकी त्वरित हटवावीत आणि प्रत्येक वॉर्डात विशेष आरोग्य पथके कार्यरत करावीत.
वाई शहराला रोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने केवळ बैठका आणि कागदी घोषणा न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे. अन्यथा साथीच्या रोगांचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी वाई नगरपरिषद, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर राहील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?
दरम्यान, वाई शहराच्या विकासासाठी राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून शहरातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिल्याचे माजी नगरसेवक आणि वाई नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती चरण रमेश गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच पक्षाचे विद्यमान आणि माजी नगरसेवक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनतेसोबत काम करण्यास तयार आहेत.
चरण गायकवाड यांनी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, गटारे साफ करावीत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन केले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा सर्वांत महत्त्वाचा असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाई शहरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






