मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आमदार झिरवळ यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आंदोलन करत आहे. आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात तास वाट बघावी लागली. सात तास बसून राहून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट न होऊ शकल्याने आदिवासी आमदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती. यानंतर यानंतर आदिवासी आमदारांनी, नरहरी झिळवाळ यांच्यासह मंत्रालयातील जाळीवर उडी मारली. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मंत्रालयातील जाळीवर आदिवासी समाजातील आमदारांनी मारलेल्या उडीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, ”सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून ‘जनतेच्या सेवेला सत्ता हवी’, म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. ”
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ?
सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य… pic.twitter.com/XDRzPVIT5E
— Raj Thackeray (@RajThackeray) October 4, 2024
पुढे आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, ”महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे. आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा !”
धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका सरकारने मागे घ्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसोबतच नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आमदार आंदोलनातही सहभाग घेतला आहे. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पेसी भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत असं झिरवळ म्हणाले होते.