
राज्यातील चेकपोस्ट बंद होणार; पोलीस, आरटीओकडून अवैध वसुली (फोटो सौजन्य-Gemini)
मुंबई : राज्याच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्ट संदर्भात वारंवार येणाऱ्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनानेही हा निर्णय पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्धार केला असून राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
भारतात वन नेशन, वन टॅक्स या संकल्पनेंतर्गत जीएसटी व्यवस्था लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. पण, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आजही चेकपोस्ट सुरू असून, तिथे पोलीस व आरटीओ खात्यातील काही घटक अवैध वसुली करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
नाना पटोले लक्षवेधीच्या मुद्यावर म्हणाले, * देशपातळीवर कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्रानेही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात करचोरी रोखण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्कासह इतर विभागांमध्ये होणारे मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार थांबवण्यासाठी राज्याच्या सीमांवर सर्वत्र चेकपोस्ट उभारण्यात आले. या चेकपोस्टच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीचे होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
नंतर मात्र ‘वन नेशन, वन टॅक्स’ या संकल्पनेअंतर्गत जीएसटी व्यवस्था लागू करण्यात आली. जीएसटी लागू झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. परंतु, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही या चेकपोस्ट सुरू आहेत. प्रत्यक्षात या चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण असते. काही ठिकाणी दलालांचे जाळे तयार झाले असून तेथे अक्षरशः लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पटोले यांनी आरोप केला की, पोलिस आणि परिवहन विभागातील काही घटकांकडून अवैध वसुली सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. मी विधानसभा अध्यक्ष असताना अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्या संदर्भात संबंधित आयुक्तांशी चर्चा केली असता त्यांनी ही व्यवस्था काही काळापुरतीच असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात सरकार या चेकपोस्टसाठी करार वाढवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे निर्माण झालेला सावळागोंधळ आणि सुरू असलेली वसुली थांबवण्यासाठी राज्य सरकार या चेकपोस्ट बंद करणार का, असा सवाल पटोलेंनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला.