
Mira Bhayander
डिसेंबर महिन्यात रात्रीच्या सुमारास तलाव रोड परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळविल्यानंतर अग्निशमन दल व वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बिबट्याने एका तरुणीवर अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने अतिशय धाडसाने आणि शिताफीने बचावकार्य हाती घेतले. एका घरामध्ये अडकलेल्या कुटुंबाला बिबट्याच्या धोक्यातून बाहेर काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. या कारवाईदरम्यान प्रत्येक क्षण अत्यंत तणावपूर्ण होता, तरीही अधिकाऱ्यांनी धैर्य आणि समन्वय दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवण्यात आली. विशेष जाळे आणि यंत्रणांचा वापर करून अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. आज झालेल्या महासभेत या सर्व धाडसी अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महापौर डिंपल मेहता यांनी त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी त्यांनी सांगितले की, “अशा कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने काम करणारे अग्निशमन दल आणि वन विभागाचे अधिकारी हे खऱ्या अर्थाने शहराचे हिरो आहेत. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.”
महासभेत उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनीही या कार्याचे कौतुक करत अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या घटनेने आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमधील समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या संपूर्ण घटनेमुळे मिरा-भाईंदर शहरातील आपत्कालीन यंत्रणांची तत्परता आणि कार्यक्षमता समोर आली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.