
BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांनी ही भेट नाकारल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून, आयुक्तांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर हे मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, आयुक्तांकडून बैठक नाकारण्यात आल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भेट नाकारण्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नसल्याचा दावाही करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर वंचितच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पालिका आयुक्त अश्विनी भिडे या कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, असा सवालही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
महापालिका कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीचा प्रयत्न करण्यात आल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाल्यानंतर पालिका आयुक्तांच्या कार्यालयातून संपर्क साधण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.
आयुक्तांच्या पीएकडून फोन करून त्या भेटीसाठी थांबल्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित पदाधिकारी भेटीसाठी पोहोचल्यानंतर आयुक्त उपस्थित नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे भेटीसाठी वेळ देऊनही आयुक्त प्रत्यक्ष उपस्थित का राहिल्या नाहीत, असा सवाल वंचितकडून करण्यात आला.
प्रकाश आंबेडकर यांची भेट वारंवार नाकारली जात असल्याचा दावा करत वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सोमवारच्या दिवशी दुपारी ३ ते ५ हा भेटीचा वेळ असल्याचे सांगितले जात असतानाही बैठक झाली नसल्याचा आरोप करण्यात आला.
‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
पालिका प्रशासन आणि कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक नेत्यांना भेटण्याची भूमिका प्रशासनाने स्पष्ट ठेवावी, अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्याच्या प्रकाराबद्दल अश्विनी भिडे यांनी माफी मागावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि अश्विनी भिडे यांच्यातील भेटीबाबतचा वंचितचा दावा आणि त्यावर पालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.