
मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाकडून मुंबईतील माहिम परिसरात आंदोलन करण्यात आले. आंदोलक शिवतीर्थाच्या दिशेने जात असताना मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर शिवतीर्थ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुंबईतील विविध भागांतून मनसे कार्यकर्ते शिवतीर्थ परिसरात जमल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे नेते गजानन काळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. भाजप कार्यकर्ते शिवतीर्थाकडे जात असताना मनसे कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या समस्या आणि महाविद्यालयातील सुविधांची पाहणी करण्यासाठी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. यावेळी कँटिनमधील जेवणाची गुणवत्ता तसेच खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले.
याचवेळी एका विद्यार्थ्याने कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले. मनसे कार्यकर्त्याने हा फोटो खाली उतरवला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यावरून वाद सुरू झाला.
दरम्यान, या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करणे, कार्यालयात प्रवेश करून फोटो हटवणे आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे मनसे आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात या प्रकरणावरून दोन्ही पक्षांकडून आणखी राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.