
मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली या भागांतील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मेरिटाईम बोर्डाचीही मंजुरी मिळणार असून, या वर्षांच्या पावसाळ्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मुंबईची लोकसंख्या सध्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून भविष्यात हीच लोकसंख्या दोन कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पालिकेने समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता, मात्र अखेर ‘जीक्यूपीआर’ कंपनीची निवड करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू होते, ज्याला आता यश आले आहे.
या प्रकल्पावर साडेतीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पात समुद्रातून पाणी आणण्यासाठी आणि प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी दोन किमी लांबीचे दोन बोगदे बांधावे लागणार आहेत. पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळेल.
Mumbai Pollution : विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी
आधी या प्रकल्पासाठी ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. वाढती गरज ओळखून मुंबई पालिकेकडून गारगाई धरण प्रकल्प राबविण्याचीही तयारी सुरू असून, त्याला स्थायी समिती व सभागृहाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. आता मनोरी प्रकल्पाला ‘सीआरझेड’ची मंजुरी मिळाल्याने मुंबईच्या पाणी पुरवठ्याला नवसंजीवनी मिळणार आहे.