
700 sanitation workers' strike ends after three days Nanded News
Nanded News : नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन अखेर प्रशासनाने माघार घेतल्यानंतर मागे घेण्यात आले. (Nanded News) अमृत इंटरप्राईजेस कंपनीत कार्यरत सुमारे ७०० सफाई कामगारांनी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहापासून कामबंद पुकारत शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प केली होती. दोन कंत्राटी सुपरवायझरांकडून होत असलेल्या कथित गैरवर्तन, दमदाटी व मानसिक छळाच्या निषेधार्थ कामगारांनी आंदोलन छेडले होते. (Maharashtra News)
सफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या परिणामी शहरात कचऱ्याचे डीग साचून नागरिक त्रस्त झाले. प्रशासनाने सुरुवातीला ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप युनियनने केला. अखेर परिस्थिती गंभीर होताच महापौर कविता मुळे यांच्या दालनात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, प्रशासनाचे अधिकारी, नगरसेवक आणि अमृत इंटरप्राईजेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे देखील वाचा : MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम
कामावर घेण्यासाठी पुन्हा होणार बैठक
चर्चेनंतर संबंधित दोन सुपरवायझरांना नाली व झाडू सफाई कामातून दूर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच’ घरी बसून पगार घेत’ असल्याचा आरोप असलेल्या तीन ते चार कर्मचाऱ्यांबाबत चार ते पाच दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय यापूर्वी कमी करण्यात आलेल्या सुमारे १०० सफाई कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचेही मान्य करण्यात आले.
कारवाईचा इशारा
दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता स्वच्छता सेवा बंद ठेवल्याबद्दल महापालिकेने अमृत इंटरप्राईजेसला नोटीस बजावली होती. पर्यायी व्यवस्था न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. युनियनच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर कामगारांनी दुपारी चार वाजेनंतर कामबंद आंदोलन मागे घेतले असून स्वच्छतेच्या कामास सुरूवात केली आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी दिली. असून आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील आठवड्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिंगे यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : PM Modi in Puducherry: “पुद्दुचेरीला दिल्लीतील एका कुटुंबासाठी ATM बनवले…; PM मोदींचा भाषणातून काँग्रेसवर निशाणा
अर्धापूरमध्ये हॉटेल चालकास मारहाण
अर्धापूर तालुक्यातील तामसा कॉर्नर येथील हरीओम हॉटेलमध्ये नाश्ता करून पैसे न देता हॉटेल चालकास शिवीगाळ, मारहाण करत दरमहा १० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता तसेच २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तामसा कॉर्नर येथील हरीओम हॉटेलमध्ये घडली. आरोपी मन्मथ हिंगमिरे, शुभम कल्याणकर, गोविंद कानोडे व विनोद साखरे यांनी संगनमत करून हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्यानंतर नाश्त्याचे पैसे न देता हॉटेल चालक आनंदा अशोक येळगे (वय ३८, रा. आंबेगाव ता. अर्धापूर, सध्या रा. तामसा कॉर्नर अर्धापूर) यांना शिवीगाळ करत थप्पड व बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी अर्धापूरमध्ये हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये द्यावे लागतील,’ अशी खंडणीची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.