
नाशिक जिल्ह्यात १६२ गावांना टँकर
नाशिक : मार्चच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. मे महिन्यात पारा अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता धरणातील जलसाठ्यावरून दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख व मध्यम धरणांचा मिळून २६ प्रकल्पांमध्ये आता केवळ ४४.३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७ प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा आहे तर मध्यम प्रकल्पांमध्ये ४४ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
गंगापूर धरण समूहात इतर धरणांच्या तुलनेने बरी स्थिती असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत येथेही पाणीसाठा कमीच आहे. गंगापूर धरणात सध्या ५४.१४ टक्के तर दारणात ५१.२८ टक्के, कडवा धरणात ५२.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या तुलनेत लहान आणि मध्यम प्रकल्पांमध्ये मात्र पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
येवला तालुक्यात धावताहेत सर्वाधिक टँकर
येवला तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, या तालुक्यात ३१ गाव वाड्यांना १९ टँकरच्या माध्यमातून ३४ फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले जात आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ३६ गावांना ९ टँकरद्वारे १६ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. तर इगतपुरीत ३९ गाव, वाड्यांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
उन्हाच्या तडाख्याने विहिरी, हातपंप आटले
उन्हाच्या तडाख्याने विहिरी, हातपंपांनाही पाणी आटले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तहान भागवण्यासाठी टँकरची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यात १६२ गावे आणि ५५ वाड्यांना टँकरने पाणी पुरवलेजात आहे. यात १०२ टँकरच्या फेऱ्या करून ९७ हजार ८४१ नागरिकांची तहान भागविली जात आहे. निफाड, मालेगाव, येवला आणि सिन्नर तालुक्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र असून या भागात टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे.
पाणी टंचाई होण्याची शक्यता अधिक
काही ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने येत्या काळात पाणीटंचाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.