
ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा
उन्हाळ्यानंतर पावसाळी हंगाम सुरु झाल्यानंतर शासनाकडून टैंकर बंद केले जातात. परंतु यंदाचे चित्र वेगळे ठरत आहे. मान्सूनने उशिराने केलेले आगमन, त्यातही कमी हजेरी यामुळे विभागात पाणीटंचाई कायम आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले होते. मात्र पाणीटंचाई कायम असल्याने जिहाभारातून टैंकरसाठीचे प्रस्ताव येणे सुरूच होते.
परिस्थिती पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा टँकर सुरु करण्यात आले आहेत. आजघडीला ऐन पावसाळ्यात तब्बल ३०३ टँकरद्वारे मराठवाड्यात पाणीपुरवठा केले जात असल्याचे चित्र आहे. ७ जुलै रोजीच्या शासकीय टँकर अहवालानुसार मराठवाड्यातील १०३ गावांमध्ये आणि ८४ वाड्यांमध्ये एकूण २०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता.
यासाठी १५ शासकीय व १८५ खासगी टैंकर कार्यरत असून १३६ शासकीय व ५५५ खासगी अशा एकूण ६९१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. यात छत्रपती संभाजीनगरसह, हिंगोली आणि धाराशीव या तीन जिल्ह्यांत एकही टँकर सुरू नव्हते तर जालना जिल्ह्यातील ७० गावे आणि ३२ वाड्यांना सर्वाधिक १०७टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु होता.
बीड, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातही टैंकरद्वारे पाणी पुरवठा कायम होता. दरम्यान, १४ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार, संभाजीनगरात सर्वाधिक ११६, जालन्यात ९२, बीडमध्ये ६६ तर नांदेड १५ आणि परभणीत १२ टैंकर सुरु आहेत. याशिवाय हिंगोली आणि लातुरात प्रत्येकी एक एक टैंटँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यात आजघडीलादेखील शून्य टँकरसंख्या आहे. या टँकरसाठी विभागातील एकूण ८७४ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांतील भूजलपातळी पुरेशी वाढलेली नव्हती, त्यातच जुलैमध्येदेखील पावसाने समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाई कायम आहे.
| जिल्हा | बाधित गावे | बाधित वाड्या | सुरू टँकर संख्या | अधिग्रहित विहिरी |
| १. छ. संभाजीनगर | ९१ | ३४ | ११६ | ३० |
| २. जालना | ५८ | २८ | ९२ | १०६ |
| ३. बीड | २१ | ३६ | ६६ | ९५ |
| ४. नांदेड | ४ | १६ | १५ | १९६ |
| ५. परभणी | ७ | ० | १२ | ७२ |
| ६. हिंगोली | ० | ३ | १ | ८८ |
| ७. लातूर | १ | ० | १ | १९६ |
| ८. धाराशिव | ० | ० | ० | ९१ |
| एकूण (विभाग) | १८२ | ११७ | ३०३ | ८७४ |