
बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांनी बाधित शेतकरी आंदोलन अधिक चिघळणार असे दिसत आहे. त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या निमीत्ताने शासनाने गोदावरीला घाट बांधण्याचे व त्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. तसेच डिपी रस्ते, साधुग्राम, कचरा डेपो यासाठी जमीनी घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता थेट कामाला सुरूवात केली आहे. सरकारच्या या अतातायी प्रकाराने मागच्या आठवडयात शेतकऱ्यांनी एकत्र येत घाटांचे काम बंद पाडले. मात्र, ताबडतोब दुसऱ्या दिवशी काम सुरू झालेले पाहून शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत. तथापि, शासनाने त्यांची दखल घेतली नाही.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह शनिवारी येथे आले असता त्यांनी तुम्हाला सरकारी भावाने मोबदला मिळेल, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, असे बोलले तसेच त्यांनी शेतकऱ्यांना वेळ दिला नाही मात्र मंदिर आणि कुशावर्तावर जाऊन साधू-महंतांच्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि रविवारी सकाळपासून आंदोलन स्थळावर जळाऊ लाकडाचे ढिगारे त्यांनी आणून टाकले. बाधीत शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही आत्मदहन करतो, असा पवित्रा घेतला आहे.
Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
रविवारी अंदोलन स्थळावर आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत कामाच्या जागेवरील जेसीबी, हायवा ट्रक यांसारखी यंत्रसामग्री दूर हालवण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणत्याही प्रकारे काम सुरू केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन घडणाऱ्या प्रकाराला सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. रविवारी आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी अंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन आखाड्यांच्या जमीनी बाधीत होत असल्याचे सांगीतले तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. उपस्थित साधूंनी शेतकऱ्यांची मुले उपाशी ठेवण्याचे काम जमीन घेतल्याने होणार असेल तर आम्हाला तो कुंभमेळाच नको, अशी भूमिका घेतली आहे.
आंदोलकांनी आपल्या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अंदोलन स्थळावर फलक लावून त्यावर निषेध व्यक्त केला आहे. याबाबत निषेधाचे फलक काढून घ्या, असा मोघम निरोप सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आंदोलकांना देण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकारे कायद्याचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या जमीनी नापीक करणे अथवा ताब्यात घेण्याचे प्रकार झाले तर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
इतवारीतील धार्मिक वास्तूबाबत न्यायालय कठोर; मनपाला फटकार, ८ आठवड्यांत निर्णयाचे निर्देश