
उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. जणू सूर्य आग ओकत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही पोल्ट्री फार्ममध्ये उष्माघातामुळे दररोज ५० ते ८० कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
तापमान ३७ अंशांच्या वर गेल्याने कोंबड्यांची सहनशक्ती संपत आहे. शेडमधील कोंबड्यांना हवा खेळती न मिळाल्यास उष्माघाताचा धोका अधिक वाढतो. उन्हाळा नुकताच सुरू झाला असून, तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती आगामी काळात अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उष्णतेमुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचे खाणे-पिणे मंदावले आहे. वाढत्या मृत्यूनंतर शेतकरी हवालदिल झाले असून, आपले लाखो रुपयांचे नुकसान कसे भरून काढायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आगामी दिवसांत तापमानाचा उच्चांक गाठल्यास पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णता खूपच वाढली आहे. शेडमध्ये तापमान असल्यामुळे कोंबड्यांना उष्माघात होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पोल्ट्री व्यवसाय टिकवणे सध्या कठीण झाले आहे, अशी माहिती पोल्टी व्यावसायिक बाळू भरसट यांनी दिली.
पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांना नियंत्रित तापमानात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने शेडमधील उष्णता झपाट्याने वाढत आहे. पुरेशी वायुवीजन व्यवस्था, कूलिंग सिस्टम किंवा पाण्याची उपलब्धता नसल्यास कोंबड्यांना उष्माघाताचा धोका वाढतो. अनेक शेतकरी परिस्थितीशी झुंज देत असले तरी, वाढते वीजदर, कूलिंगसाठी लागणारा खर्च आणि व्यवस्थापनातील अडचणी यामुळे त्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कोंबड्यांचे उत्पादनही घटले असून, अंडी उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे.
तज्ञांच्या मते, तापमान नियंत्रणासाठी शेडमध्ये फॉगर्स, पंखे, थंड पाण्याची व्यवस्था आणि योग्य आहार यांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, शासनाकडून मदत आणि मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत, उष्णतेच्या लाटेमुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर पशुपालन क्षेत्रही मोठ्या संकटाचा सामना करत असल्याचे स्पष्ट होत आहे.