
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये
नाशिकच्या रिंगणात आता तीन प्रमुख उमेदवार आमनेसामने ठाकल्याने लढत कमालीची चुरशीची बनली आहे महायुती (अधिकृत): शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार नरेंद्र दराडे, बंडखोर अपक्ष भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते, बंडखोर/अपक्ष माजी मंत्री बळीराम हिरे यांचे सुपुत्र प्रसाद हिरे या दोघांनीही माघार न घेतल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. आता या दोघांपैकी कोणाचा तरी अधिकृत पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीचे नेते फिल्डिंग लावत आहेत.
निवडणूक तिरंगी झाल्यामुळे प्रत्येक मत विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदार असलेल्या नगरसेवकांच्या मतांचे महत्व प्रचंड वाढले असून स्थानिक पातळीवर मोठ्या ‘आर्थिक व्यवहारांच्या चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोडेबाजाराचा इतिहास जुनाच असला, तरी यंदा मतांची किमत कमालीची वाढल्याच्या बर्वांनी राजकीय वातावरण अधिकच तापविले आहे, मात्र या चर्चाना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
नाशिकचा हा तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन या दोन्ही बड्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये मुक्काम करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बंडखोरांनी माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने हा प्रयत्न निष्फळ ठरला. परिणामी, रविवारी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये येत स्वतः सूत्रे हाती घेतली असून राजकीय तडजोडीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
या निवडणुकीत नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकांसह जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निर्वाचित नगरसेवक हेच मतदार आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर लढत तिरंगीच राहिली, तर उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क आणि ऐनवेळी मिळणारे पाठिंबे नगरसेवकांची राजकीय गणिते उलथीपालथी करू शकतात.
यामुळेच सर्वच उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मतदार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मनधरणी, बैठका आणि गुप्त संपर्क मोहिमा तीव्र केल्या आहेत.
आता मंत्री गिरीश महाजन यांच्या या ‘नाशिक मुक्कामातून’ महायुतीला बंडखोरांचा पाठिंबा मिळवण्यात यश येते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.