राहूड घाटात बर्निंग एसटी बसचा थरार; काही क्षणातच बस जळून खाक, बसमधील 52 प्रवासी...
चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरच्या खोकड तलावासमोरील निसर्ग लॉन्सजवळ एक दुर्घटना घडली. रेणुकादेवी मंदिर घाट उतरून चांदवड येथील निसर्ग लॉन्सजवळ शहादा-नाशिक एसटी बसला अचानक भीषण आग लागली. या आगीत बसमधील महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५४ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
शहादा आगाराची (एमएच-१५/जेडब्ल्यू-०८९५) क्रमांकाची बस सकाळी सव्वाआठ वाजता शहादा येथून नाशिककडे जाण्यासाठी निघाली होती. दुपारी चांदवडजवळ आली असता बसच्या गिअर बॉक्सजवळ शॉर्टसर्किट झाले आणि अचानक धूर निघू लागला. बसमधील एका महिला प्रवाशाच्या हे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वाहक सचिन बंडू ननावरे यांना माहिती दिली. वाहकाने चालकाला सावध करताच चालक गोविंद किसन पाटील यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला उभी केली.
भीषण आगीत ट्रक जळून खाक, सुदैवाने चालक बचावला; हिंगोली जिल्ह्यातील घटना
दरम्यान, धुराचे लोट दिसताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवासी जीवाच्या आकांताने बसमधून खाली उतरले. प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला नाही तोच, काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढा घातला आणि काही वेळातच बस जळून खाक झाली. या बसमधून प्रवास करणारी दोंडाईचा येथील कृषी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी वैष्णवी जाधव हिच्या दोन बॅगांमधील शैक्षणिक साहित्य, नोट्स आगीत जळून खाक झाले.
वाहतूक एकाच मार्गाने वळवली
निसर्ग लॉन्ससमोर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली होती. त्यातच बसला आग लागल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तासभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.
यापूर्वीही बसने घेतला होता पेट
दुसऱ्या एका घटनेत, पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका धावत्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. परंतू बसचालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्यामुळे बसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही बस रस्त्याच्या कडेलाच असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दोन तास विस्काळीत झाली होती.






