"मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका...", वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला
इतिहासाच्या नोंदीनुसार हे मंदिर काशी विश्वेश्वराचे स्थान मानले जाते. धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या या मंदिराला केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षण असल्याने त्यात कोणताही हस्तक्षेप केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खरात यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. वैजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेने काही स्थानिक तरुणांनी खरात यांना बोलावले होते. मात्र त्यांनी मंदिर पाडण्याचा सल्ला दिल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आणि अखेरीस या विषयाला बगल देण्यात आली.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, कॅप्टन अशोककुमार खरात त्या वेळी मोबाईलमधील एका अॅपचा वापर करत होते, मोबाईलकडे जग्गू, जग्गू सर्व इट” अशी कमांड देत ते काही प्रश्न विचारत असत. त्यानंतर त्या अॅपमधून येणाऱ्या उत्तरांवरून मंदिराची क्षमता क्षीण झाल्याचा, तसेच शिवलिंगातील शक्ती नष्ट झाल्याचा दावा ते ग्रामस्थांसमोर करत होते. मोबाईलवरील या प्रक्रियेमुळे उपस्थित काही ग्रामस्थांचा क्षणभर या प्रकारावर विश्वासही बसला होता. मात्र नंतर ग्रामस्थानी या दाव्यांकडे दुर्लक्ष करत या विषयाला बगल दिली.
ग्रामस्थांच्या मते, त्या वेळी खरात मोबाईलमधील एका अॅपद्वारे विचित्र भाषेत प्रश्न विचारत होते आणि त्यातून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे मंदिर ‘गावासाठी घातक’ असल्याचा दावा करत होते. त्यांच्या या दाव्यामुळे उपस्थित लोक काही काळ गोंधळून गेले होते. त्यावेळी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला असता तर गावातील या ऐतिहासिक मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले असते आणि कायदेशीर अडचणीही ओढवल्या असत्या, अशी चर्चा सध्या गावात रंगली आहे. ‘त्यावेळी या भानगडीत पडलो नाही, हेच बरे झाले, ‘असे म्हणत मंदिर जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.






