
क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच मार्गाची ओळख आता मृत्यूचा सापळा म्हणून होऊ लागली आहे. कारण या मार्गावर ६० किमी प्रती तास एवढी मर्यादित ठेवली असताना ही काही वाहन चालक हे अती वेगवान वाहन चालवून आपल्यासह इतरांचा देखील जीव धोक्यात घालताना दिसून येत आहेत.
संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास एनआरआय सिग्नल च्या पुढे काही अंतरावर नेरुळहुन बेलापूर कडे जाण्याच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. विपुल महेंद्र कंगाली, वय ३० वर्ष, राहणार नागपूर असं मयत युवकाच नाव आहे. विपुल कंगाली हा एक लग्नकार्यासाठी नवी मुंबईत आला होता. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर मयत युवक हा मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवत होता, त्यामुळे दुभाजकाच्या दगडाला कट लागल्याने त्याची बाईक स्लिप झाली आणि तो खाली पडला, डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचा वेग एवढा प्रचंड होता की अपघात स्थळापासून दुचाकी जवळपास 20 ते 25 फूट पर्यंत दुचाकी घासत गेली असल्याचं यावेळी प्रत्यक्षदर्शीनी यावेळी सांगितलं.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात
शहरात अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान नुकतेच राबवले होते. यावेळी सुप्रसिद्ध मराठी कलाकार स्वप्नील जोशी व सुप्रसिद्ध गायक साईराम अय्यर, यांनी हजेरी लावत नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्व सांगितले होते. तसेच वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी वाचून दाखवली होती. मात्र या रस्ता सुरक्षा अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी देखील प्रतिसाद देत वाहतुकीचे नियम पाळावे अश्या चर्चा नवी मुंबईतील नागरिक करत आहेत.