
ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव बिनविरोध; स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर
या स्थगितीच्या निर्णयाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक आनंदराव पवार यांनी तीव्र विरोध दर्शविला. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाची निवड तत्काळ जाहीर करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मात्र नगराध्यक्ष मलगुंडे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. सभागृहात पक्षीय बलाबल गट करण्याबाबत १२ व १३ जानेवारीच्या शासन दरबारी निघालेल्या अध्यादेश याबाबतीत अभिप्राय घेण्यासाठी तिसऱ्या उमेदवारांची निवड तहकूब केल्याचे नगराध्यक्ष मलगुंडे यांनी सांगत सभा संपवली.
ईश्वरपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात दुपारी बारा वाजता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष आनंद मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला नोटीस वाचन करून निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांचे वाचन करण्यात आले. उपनगराध्यक्ष पदासाठी खंडेराव रामचंद्र जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने तो वैध ठरवण्यात आला. निर्धारित वेळ संपल्यानंतर जाधव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, नगरपालिकेसाठी पंधरा प्रभागातून ३० नगरसेवक व थेट नगराध्यक्ष असे ३१ संख्याबळ आहे. २२ नगरसेवक व नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( श. प.) आहेत. स्वीकृत नगरसेवकांपैकी दोन सदस्य सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निवडले जाणे अपेक्षित होते. विरोधी गटांमध्ये भाजपाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तीन व शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्याने महायुतीचा स्वतंत्र गट स्थापन होण्याची शक्यता होती. मात्र भाजप व शिवसेनेने एकत्रित गट स्थापन केला आहे. त्याचे ५ नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक यांचा एक गट आहे.
गटनोंदणी व रद्द झालेल्या आदेशाबाबत निर्णयासाठी वेळ मिळणे अपेक्षित असल्याचे सांगत तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या अर्जावर सध्या निर्णय न घेण्याचा पवित्रा नगराध्यक्ष मलगुंडे यांनी घेतला. भाजप-शिवसेना गटातर्फे अमित ओसवाल यांचा अर्ज वैध ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मनीषा जयवंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तिसऱ्या जागेसाठी भाजप-शिवसेना गटाचे अमित ओसवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून विजय देसाई असे दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाची निवडणूक स्थगित झाल्यामुळे अखेर ही जागा सत्ताधारी गटाकडे जाणार की विरोधकांना संधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगरपालिकेची पहिली सभा ठरली वादळी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिली सभा आज झाली. नगराध्यक्ष मलगुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना थोपवले. मी पिठासन अधिकारी आहे. निर्णय देणे माझा अधिकार आहे. माझा निर्णय अंतिम राहील असे सुचित केले. सभागृहातील नव्या सदस्यांना तुम्ही काय शिकवण देणार आहात? असे शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी सुनावले. विकास कामासाठी एक आहात तर तिसरा नगरसेवक का आजच निवडत नाही. भूमिका शिवसेनेने घेतली. नगरसेवक पवार यांनी आपल्या हातातील कागद फाडून सभागृहात फेकत निषेध नोंदवला.