
नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार
नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेले नागपूरचे 106 भाविक काठमांडू येथे अडकले होते. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे त्यांचा परतीचा प्रवास रखडला होता. या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक सूचना दिल्या.
देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…
काठमांडू प्रशासनाच्या मदतीने भाविकांसाठी चार खासगी बसची व्यवस्था करण्यात आली. या बसमधून सर्व 106 भाविक शुक्रवारी काठमांडूहून सीतामढीकडे रवाना झाले. त्यानंतर बिहार सरकारच्या मदतीने ते रात्री पाटणा येथे पोहोचले.
यातील चार भाविक विमानाने दिल्लीला पोहोचले असून तेथून रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले आहेत. तर उर्वरित 102 भाविक शनिवारी सकाळी पाटणाहून रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले. त्यामुळे भाविकांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना नेपाळमधील महापुराच्या परिस्थितीमुळे तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. त्यांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे.
हे 37 भाविक आता काठमांडूहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी नगरसेवक विनोद शेलार उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या मुंबईतील एका डॉक्टर दाम्पत्याचा संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे हे नेपाळमध्ये गेले होते.
डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयातील रक्त संक्रमणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत, तर डॉ. गायत्री देशपांडे नानावटी रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख असल्याची माहिती आहे. ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या टूर कंपनीमार्फत हे दाम्पत्य नेपाळला गेले होते.
देशात सर्वाधिक जमीन सरकारी मालकीची; संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे देखील प्रमुख जमीनदार
बुधवारी सकाळी 8.28 वाजता कुटुंबीयांचा त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. व्हॉट्सॲप संदेशांनाही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या डॉक्टर दाम्पत्यासह महाराष्ट्रातील आणखी काही पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांच्या शोधासाठी आणि सुरक्षित परतीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकार तसेच नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला जात आहे.