मुद्रांक परताव्याबाबत महत्त्वाची अपडेट; आता केवळ 15 दिवसांमध्ये मिळू शकतो परतावा (Photo : iStock)
पुणे : नोंदणी आणि मुद्रांक शुल्क परताव्यासाठी अर्ज केल्यानंतर यापूर्वी मुद्रांक परताव्याचा अर्ज निकाली काढण्यासाठी काही महिन्यांचा लागणारा कालावधी आता कमी झाला आहे. आता केवळ 15 दिवसांमध्ये मुद्रांक परतावा मिळणे शक्य होणार आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे.
महसूल विभागाचा भाग असलेल्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नोंदणी शुल्क तसेच मुद्रांक शुल्क परताव्याची प्रकरणे ज्या दिवशी नागरिकांकडून अर्ज आला त्याच दिवशी निकाली काढण्यात यावी, असा आदेश सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी काढला आहे. एखादा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद करून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याकडे तो सुपूर्द करण्यात यावा. तसेच अर्जासह कागदपत्रांची छाननी करावी. त्यानंतर त्याबाबत टिपण्णी तयार करून आदेश मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
एप्रिल २०२३ अखेर मुद्रांक शुल्क परताव्याची एकूण ३९२४ तसेच नोंदणी शुल्काची १७१६ इतकी प्रकरणे प्रलंबित होती. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी देयक व कोषागारात सादर करण्यासाठी सुमारे नऊ ते बारा महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यानंतर एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुद्रांक आणि नोंदणी शुल्काची एकूण २५३५ इतकी प्रकरणे प्राप्त झाली होती. त्याशिवाय मागील अशी ८१७५ प्रकरणे प्रलंबित होती. ही सर्व प्रकरणे जानेवारी २०२४ अखेर निकाली काढण्यात आली.
मुद्रांक शुल्क परताव्याची तीन हजारांहून अधिक प्रकरणे निकाली
या वर्षीच्या जानेवारी ते जून या काळात नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क परताव्याची तीन हजारांहून अधिक प्रकरणे त्याच काळात निकाली काढण्यात यश आले आहे. त्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत होता. जुलै महिन्यापासून मुद्रांक तसेच नोंदणी शुल्क परताव्याची प्रकरणे प्राप्त झाल्यापासून निकाली काढण्यासाठी आता १५ दिवसांचा कालावधी लागत आहे.
अवघ्या एका दिवसात प्रकरणे निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू
महसूल सप्ताहांतर्गत अवघ्या एका दिवसांत प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्या दिवशी १९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सात ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहील. नागरिकांना परतावा प्रकरणांच्या निपटाऱ्याची सद्यस्थिती माहिती व्हावी यासाठी दर महिन्यांच्या एक आणि १२ तारखेला त्या दिवशीपर्यंत कोणत्या दिनाकांची प्रकरणे निकाली काढली आहेत, त्याची माहिती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे नोंदणी मुद्रांक विभागाकडून सांगण्यात आले.
प्रकरणं 15 दिवसांत निकाली काढण्यात येणार
मुद्रांक तसेच नोंदणी शुल्क परतावा मिळविण्यासाठी दोन वर्षापूर्वी साधारणत: एक वर्षांचा कालावधी लागत होता. जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची प्रकरणे दीड महिन्यात निकाली काढण्यात आली आहे. १५ दिवसांत निकाली काढण्यात येणार आहे.






