
उर्से गावातील रहिवासी आणि एस.पी.एच. हायस्कूल, बोर्डी येथील इयत्ता 9 वीची विद्यार्थिनी असलेल्या नेहाने पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्र राज्यातही अव्वल स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातून निवड झालेल्या केवळ 14 विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश असून, पालघर जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. या निवडीनंतर नेहाला येत्या 20 मेपासून तामिळनाडूमधील श्रीहरिकोटा येथील इस्रो केंद्रात दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण (वर्कशॉप) घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिला अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक प्रयोगांचा थेट अनुभव मिळणार आहे.
नेहाच्या या यशामुळे तिचे कुटुंब, शाळा, तसेच उर्से गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहाचे वडील संदीप पाटील यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “नेहाच्या मेहनती, जिद्द आणि अभ्यासातील सातत्यामुळेच तिला हे यश मिळाले आहे.”
उर्से गाव हे पालघर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. या गावाला आध्यात्मिक वारसा लाभलेला असून, स्वाध्याय परिवारासह विविध अध्यात्मिक चळवळींचा गावावर प्रभाव आहे. याच सकारात्मक वातावरणामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मूल्ये आणि अभ्यासाबद्दलची ओढ निर्माण झाली असून, त्याचेच फलित म्हणून नेहासारखी विद्यार्थिनी आज अंतराळ क्षेत्रात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.नेहाच्या या यशामुळे संपूर्ण गावकऱ्यांकडून तिचा सत्कार करण्यात येत असून, भविष्यात ती आणखी प्रगती करून शाळा, गाव, जिल्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.