लेट ट्रेन प्रकल्पाच्या बोलेरो जीपची दुचाकीला धडक, एका महिलेचा मृत्यू, चार जण जखमी
पालघर/ संतोष पाटील: पालघरमध्ये मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. मात्र या हाच प्रकल्प आता नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचं दिसून येत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत. पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गावाच्या हद्दीत रेमी कंपनीसमोर ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर वाहचालक फरार झाला असून हा आपघात बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. उज्वला रमेश जाधव (रा. देवकोप, तांडेलपाडा) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.
उज्वला जाधव या बोईसर येथील एका रुग्णालयातील आरोग्य विभागात कार्यरत होत्या. सायंकाळी रिक्षातून कामावरून घरी जात असाताना हा अपघात घ़डला. यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने या रिक्षासह मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षा व मोटरसायकलसह त्या जीपचाही चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसंच दुचाकीवरील समीर लढे व सुनीता वाढण यांना पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्वला उमेश जाधव यांना तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या व्यतिरिक्त अपघातात गंभीर जखमी झालेले रामभाऊ सापटे यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जीप चालक फरार असून याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.