
फोटो सौजन्य: Gemini
माहितीनुसार, महाबळेश्वर–पाचगणी मुख्य रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला असून अद्यापही हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवास धोकादायक बनल्याने अनेक पर्यटकांनी पाचगणी आणि महाबळेश्वर येथे येणे टाळले आहे. परिणामी पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेल्या पाचगणीतील टेबल लँड परिसर, सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर सध्या शांतता पाहायला मिळत आहे. पूर्वी या ठिकाणी सुट्ट्यांच्या काळात तसेच आठवड्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असायची. परंतु आता निसर्गरम्य वातावरण असूनही खराब रस्त्यांमुळे पर्यटक येण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
टेबल लँड परिसरातील ज्यूस स्टॉल धारक अभिजित पुजारी यांनी सांगितले की, “पूर्वी आमच्या स्टॉलवर दिवसभर पर्यटकांची गर्दी असायची. मात्र आता दिवसातून काही मोजकेच ग्राहक येतात. व्यवसाय जवळपास ठप्प झाला असून रोजच्या खर्चासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.”
तसेच घोडागाडी चालक विवेक चव्हाण यांनी सांगितले की, “घोडागाडी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. पर्यटक नसल्याने आमचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. घोड्यांच्या देखभालीसाठीही खर्च करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.”
Satara: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या ‘दरे’ दौऱ्यावर; खाजगी भेटीत दडलीये राजकीय रणनीती?
पर्यटकांची संख्या घटल्यामुळे स्टॉल धारक, घोडे चालक आणि इतर स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पन्न बंद झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले असून काहींवर उपासमारीची वेळ आली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिक व्यापारी अनुप कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “गेल्या दीड वर्षांपासून रस्ता पूर्ण होत नाही. पर्यटक येत नसल्याने आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील.”
दरम्यान, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील चार ते पाच मंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यटन व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू व्हावा आणि स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
एकूणच, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पाचगणी येथील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, स्थानिक व्यावसायिकांचे भविष्य आता या रस्त्याच्या कामावरच अवलंबून असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि रस्त्याचे काम कितपत लवकर पूर्ण होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.