
'मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी
पंढरपूर | शिवाजी हळणवर : आषाढी यात्रेच्या तोंडावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वैधतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘पाच वर्षांसाठी स्थापन झालेली समिती आता दहाव्या वर्षात कशी? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून नवीन समिती नियुक्त करण्याची मागणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जुलै २०१७ रोजी स्थापन झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलै २०२२ मध्येच संपुष्टात आला. मात्र मुदत संपून चार वर्षे उलटल्यानंतरही समिती कार्यरत असून ती आता दहाव्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. राज्यात अनेक राजकीय बदल झाले, चार मुख्यमंत्री बदलले, मात्र मंदिर समिती मात्र अद्याप कायम असल्याने भाविक आणि पंढरपूरकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
शिंदे यांनी निवेदनात असा आरोप केला आहे की, मंदिर समितीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात येणाऱ्या माहितीसंदर्भात अनेकदा अपुरी, चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे समितीच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच, मंदिर शासनाच्या ताब्यात येऊन तेरा वर्षांहून अधिक कालावधी उलटला असून पंढरपूरच्या विकासाला गती मिळत असताना मंदिर समितीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. महायुती सरकारने नव्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींना समितीत संधी द्यावी. यापूर्वी समितीवर राहिलेल्या सदस्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, तत्कालीन अध्यक्ष आ. अतुल भोसले यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद अद्याप रिक्त आहे. अनेक सदस्य नियमित बैठकींना उपस्थित राहत नसून केवळ ऑनलाइन बैठकीत सहभाग नोंदवितात. त्यामुळे समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिराच्या कारभारावर मोजक्या सदस्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
आषाढी यात्रेपूर्वीच विद्यमान समिती बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करावी, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे आषाढीपूर्वी मंदिर समितीच्या पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या (४ जुलै) पंढरपूर दौऱ्यावर येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार असून नव्या धर्मशाळा-भक्तनिवास इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान, पाच वर्षांचा कार्यकाळ संपूनही सध्याची मंदिर समिती दहाव्या वर्षाकडे वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे या दौऱ्यात समिती बरखास्ती किंवा नव्या समिती नियुक्तीबाबत काही संकेत मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार असल्याने नवीन मंदिर समिती नियुक्तीची घोषणा होणार का? याबाबत राजकीय वर्तुळासह भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.