
मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
मोहोळ, दादासाहेब गायकवाड : शासनाकडून नव्याने निर्मिती करण्यात येत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूर अंतर्गत मोहोळ तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी पंढरपूरपेक्षा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय हे अधिक जवळचे आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्याचा समावेश पंढरपूर ऐवजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी मागणी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार राजू खरे यांनी महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची पुनर्रचना सुचवण्यात आली आहे. यामध्ये नव्याने प्रस्तावित असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूरच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांसह मोहोळ तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे.
परंतु, प्रत्यक्षात मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी पंढरपूर हे ठिकाण लांबचे असून दळणवळणासाठी अत्यंत त्रासाचे ठरणार आहे. याउलट सोलापूर शहर आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे मोहोळच्या जनतेसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त आणि जवळचे आहे. त्यामुळे जनतेचा होणारा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने या रचनेत बदल करणे गरजेचे आहे.
दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
या पार्श्वभूमीवर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट केले आहे.
मोहोळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १,४०८.४० चौ.किमी. असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,७६,९२० इतकी आहे. ही मोठी लोकसंख्या लक्षात घेता, प्रशासकीय सुलभतेसाठी मोहोळचा समावेश उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट या तालुक्यांप्रमाणेच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात यावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?