
अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'आता याप्रकरणाची...'
मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्याकडून सातत्याने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे. असे असताना आता विमान अपघात प्रकरणाबाबत अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. पार्थ पवार म्हणाले की, अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्या शंका आमच्याही मनात आहेत. या संपूर्ण घटनेची सत्यता जनतेसमोर यावी, यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पुढील पावलेही उचलली जाणार असल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या भेटीत अपघाताच्या चौकशीसंदर्भात सविस्तर चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी अधिकृतरित्या मांडली जाणार आहे.
सत्ताधाऱ्यांकडूनही चौकशीची मागणी
अजित पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेभोवती अनेक प्रश्न उपस्थित होत असून, विरोधकांसह सत्ताधारी गटातील काही नेत्यांकडूनही पारदर्शक चौकशीची मागणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Ajit Pawar Death : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ
VSR विमान कंपनीच्या मालकाची CID कडून चौकशी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनाग्रस्त VSR विमान कंपनीचा मालक आर.के. सिंग पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संशय आणि आरोप प्रत्यारोपांमुळे संशयाची सुई विमान कंपनीकडे वळाली आहे. त्यातच आमदार रोहित पवार हेदेखील सातत्याने पत्रकार परिषद घेत विमान कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) यांच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारवरील दबावही वाढत चालला होता. अखेर सीआयडीने आर.के. सिंग चौकशीसाठी बोलावले आहे.