
Sanjay Raut, ShivSena UBT, Matoshree Meeting, Narendra Modi, Amit Shah, Pune News, Maharashtra Politics,
खासदारांच्या संभाव्य फुटीच्या अफवांवर बोलताना राऊत म्हणाले, उद्या मातोश्रीवर पक्षाच्या खासदारांची बैठक होत आहे. आगामी लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, खासदारांचे प्रश्न, निधी आणि इतर विषयांवर पक्षप्रमुख चर्चा करणार आहेत. पावसाळ्यामुळे मुंबईत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने ही बैठक आधीच बोलावली आहे. पक्षात अशा बैठका सतत होत असतात, त्यामुळे फुटीच्या वावड्या केवळ अफवा आहेत. अमित शाह यांनी असे ऑपरेशन टायगर १०० वेळा करून झाले आहे.
भाजपच्या हुकूमशाही आणि विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली. काँग्रेस कधीही बुडणारे जहाज नव्हते, आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. ज्या नेत्यांनी पूर्वी काँग्रेस सोडली, त्यांनी पुन्हा एकत्र आले पाहिजे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी यासाठी पुढाकार घेतला तर हे नक्कीच शक्य आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत ठामपणे राहू, असेही ते म्हणाले.
भाजपमध्येही सध्या प्रचंड नाराजी असल्याचा दावा राऊत यांनी केला. ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी आज भाजपमध्ये अनेक जण गप्प आहेत. ज्या दिवशी ही भीती संपेल, त्या दिवशी भाजपचे जहाज बुडेल. ५०-१०० कोटी रुपये नेमके कुठून येतात? राजेश मेहतासारखे १५ लाख कोटींचा घोटाळा करणारे लोक मोदींसोबत झळकतात. भाजपचे अंतिम ध्येय देशात जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करून देश व राज्य वाटण्याचे आहे, असा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना, फडणवीस हे शिंदेंचे ऑपरेशन कधी करतील सांगता येत नाही, शिंदे सध्या प्रचंड तणावाखाली वावरत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संजय राऊत यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आदित्य यांच्यात नेतृत्व करण्याची मोठी क्षमता आहे. बाळासाहेबांच्या काळातील प्रश्न वेगळे होते, आजचे वेगळे आहेत. मराठी माणसाचा हा पक्ष आणि आवाज टिकवण्यासाठी ठाकरे यांनीच नेतृत्व केले पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी पक्ष आणि राज्य पुढे नेण्यासाठी सक्षमपणे नेतृत्व करावे, हीच आमची शुभेच्छा आहे.
राज्याच्या अर्थखात्याबाबत बोलताना राऊत यांनी अनपेक्षित विधान केले. राज्याचे अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यातच राज्याचे शहाणपण आहे. सध्याच्या घडीला अर्थ खाते सांभाळू शकेल, असा एकही सक्षम नेता मला राज्यात दिसत नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासकीय पकडीची प्रशंसा केली.