गुढीपाडवा आणि रमजानच्या काळात स्वस्त धान्य दुकानात धान्य न मिळाल्याने गरिबांचे हाल झाले (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : गंगाखेड : गुढीपाडवा व रमजान ईद सणाला गंगाखेडमधील गोरगरिबांना स्वस्त धान्यापासून वंचित रहावे लागले. गंगाखेड शहरात गुढीपाडवा आणि रमजान ईद यांसारख्या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्च महिना संपत आला तरी स्वस्त धान्य दुकानांमध्ये अद्याप धान्याचा पुरवठा न झाल्याने अनेक कुटुंबांना धान्याविना रहावे लागत आहे. शहरातील (Nanded News) अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले की, अद्याप धान्यच आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना धान्य वितरित करणे शक्य होत नाही. सणासुदीच्या काळात तरी वेळेवर धान्य मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती; मात्र ती पूर्ण झाली नाही. याबाबत गोदामपालांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, आमच्याकडे वरूनच धान्य आलेले नाही. त्यामुळे पुरवठा करणे शक्य नाही. यामध्ये आमचा कोणताही संबंध नाही.
या वक्तव्यामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्ट होत आहे. गोदामपाल आणि वाहतूक ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुकानदाराला वेळेत धान्य पुरवठा होत नाही. मार्च महिन्याची २४ तारीख उजाडली असतानाही गंगाखेड शहरातील एकाही दुकानत धान्य पोहोच झालेले नव्हते. तसेच ग्रामीण भागातील ५० टक्के दुकानात अजून धान्य पोहच झालेले नाही. अन्नसुरक्षा कायदा २०१३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ७ तारीख अन्न दिन आणि ७ ते १५ अन्न सप्ताह साजरा करून रास्त भाव दुकानातून लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य वाटप होणे अपेक्षित आहे.
हे देखील वाचा : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया
त्यासाठी ७ तारखेच्या अगोदर रास्त भाव दुकानात धान्य पोहोच करणे ही वाहतूक ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची जबाबदारी आहे असे असतानाही धान्य पुरवठा वेळेवर होत नाही. शासनाने तातडीने लक्ष देऊन धान्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लाभधारक दुकानदारांना फोन करुन व दुकानावर चकरा मारुन परेशान करत असुन आम्हाला राशन द्यायचं कि नाही अशा उर्मट भाषेत लाभार्थी दुकानदारास बोलत आहेत.
हे देखील वाचा : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ
उशीरा धान्य येण्याचा फटका रास्त भाव दुकानदारांना बसला असुन लाभधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये एकुण १६३ रास्तभाव दुकाने आहेत त्यापैकी शहरात १९ दुकाने असुन शासनाकडुन या दुकानदारांना द्वारपोच धान्य मिळत असते. नियमाने एक ते दोन तारखेलाच हे धान्य गोदामातुन प्रत्येक रास्तभाव दुकानावर पोहोचणे आवश्यक आहे परंतु २३ तारीख उलटुनही रास्त भाव दुकानावर धान्य पोहच झाले नाही या प्रकाराकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर धान्य देवुन दुकानदार व लाभार्थ्यांची होणारी घुसमट थांबवावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे.






