
Bachchu Kadu Nagpur andolan: नागपूर: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेकडो शेतकऱ्यांसह त्यांनी उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मोर्चा केला आहे. बच्चू कडू यांच्या विराट मोर्चाने नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. बच्चू कडू यांच्या विराट मोर्चामुळे फडणवीसांच्या महायुती सरकारला घाम फोडला आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरमधील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाची देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. पोलिसांनी घराबाहेर बॅरिकेट्स लावले होते. यानंतर आता मोर्चा नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूर-वर्धा महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबईत बैठकीसाठी कडूंचा नकार
आंदोलक बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले. याबाबत त्यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बोलणे देखील झाले. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. बच्चू कडू म्हणाले की, “आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. नागपूरला या. नागपूरला मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. तुम्हाला जातीयवादी मोर्चात जाता येतं, तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले, असा सवाल त्यांनी बावनकुळेंना केला. यापूर्वी दोन बैठका झाल्या, पण फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. विमानातून जा-ये आणि बैठकीसाठी पूर्ण दिवस वाया जाईल, ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही. तुम्ही आमचं आंदोलन बैठकीच्या नावाने मोडून काढत आहात, असा गैरसमज होतोय, असेही बच्चू कडूंनी म्हटले.
काय म्हणाले बावनकुळे?
कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी २६, २७, २८ हे तीन दिवस बच्चू कडूंसह इतर नेत्यांशी बोलणं केलं आणि त्यानुसार बैठक लावली. त्यांनी येण्याचे कबूल केले होते, पण आता ते आले नाहीत. त्यांनी किमान एका प्रतिनिधीला तरी मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीला पाठवावे.तोडगा हा चर्चेतूनच निघतो असे सांगून त्यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही त्यांना कशाला अटक करू? आम्ही फक्त बैठकीसाठी बोलावतोय. आम्ही मुघल विचाराचे नाही, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंचा आरोप फेटाळला. बैठक लावली असताना कोणीही प्रतिनिधी न आल्याने ती रद्द करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.