
फोटो सौजन्य - Social Media
वाई : ‘पोलिओमुक्त भारत’ हे राष्ट्रीय उद्दिष्ट अधिक बळकट करण्यासाठी आणि पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आज अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेला दुर्गम भागापासून ते मुख्य शहरापर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेचा अधिकृत प्रारंभ पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले, सदस्या वंदनाताई भिलारे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रद्युम्न बुलाख यांच्या चोख मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
पाचगणी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या एरंडेल, भेकवली, टेकवली यांसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील गावांसह एकूण ३८ गावे, वाड्या आणि वस्त्यांवर विशेष लसीकरण केंद्र उभारण्यात आली होती. या मोहिमेत गावातील पालकांनी सकाळपासूनच आपल्या चिमुरड्यांना घेऊन केंद्रांवर गर्दी केली होती. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी आधीपासूनच गृहभेटी देऊन व्यापक जनजागृती केल्यामुळे एकही बालक या मोहिमेपासून वंचित राहिले नाही.
पर्यटकांच्या मुलांसाठी विशेष दक्षता: प्रमुख पर्यटन स्थळांवर ‘मोबाईल बूथ’
पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटनासाठी आलेल्या कोणत्याही कुटुंबातील लहान मूल पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली. शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले जेथे पडतात, अशा टेबल लँड, एस.टी. स्टँड, पारसी पॉईंट आणि दांडेघर नाका या प्रमुख चार ठिकाणी विशेष बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेतानाच शेकडो लहान मुलांना जागेवरच पोलिओचे डोस देणे शक्य झाले. ग्रामीण भागातील ३८ आणि पर्यटन स्थळांवरील ४ अशी एकूण ४२ बूथ या मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आली होती.
याप्रसंगी पाचगणी आरोग्य केंद्रात डॉ. मैथिली बेलोशे, डॉ. विशाल टकले, आरोग्य सहाय्यक एस. बी. रांजणे, तमन्ना काझी, डी. एच. यादव, जी. व्ही. रांजणे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. बालकांचे आरोग्य हीच देशाची खरी संपत्ती असून, प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरूक राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नागरिक, पर्यटक आणि आरोग्य यंत्रणेच्या अभूतपूर्व समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. बालकांच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी नागरिकांनी आगामी काळातही अशा सर्वच आरोग्यविषयक उपक्रमांना आपला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.