
Pune Ahmednagar Highway Traffic Jam:
Pune Ahmednagar Highway Traffic Jam: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह परिसरातील उद्योगांना बसत आहे. वाहतूक कोंडीवर वेळीच कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी इंडस्ट्रीअल फेडरेशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे कैलास नरके यांनी ही माहिती दिली.
पुणे-अहिल्यानगर महामार्गालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कामगार, अवजड वाहने, कच्चा माल तसेच तयार मालाची वाहतूक होते. मात्र, वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन प्रक्रिया, मालवाहतूक आणि कामगारांच्या वेळेवर होत आहे.
नुकतेच चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीला कंटाळून काही उद्योगांनी स्थलांतराचा विचार सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न वेळीच सोडविला नाही, तर येथील उद्योगांवरही स्थलांतराची वेळ येऊ शकते, असा इशारा फेडरेशनने दिला आहे. महाराष्ट्रात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यमान उद्योग टिकविणे आणि रोजगाराचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून उद्योग, रोजगार आणि राज्याच्या आर्थिक विकासाशी संबंधित असल्याचे संघटनेने मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव परिसरातील उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने वेळीच ठोस पावले उचलून उद्योगांना दिलासा द्यावा, अशी मागणी कैलास नरके यांनी केली आहे.